शेतमजूर आणि बारा बलुतेदार यांचं नेतृत्व आम्ही करतो. मग त्यांचं प्रतिबिंब हे येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तरामध्ये उमटलं पाहिजे.
मुंबई, दि. १२ : रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत आणि त्याआधी भारतीय जनता पक्षाने दुसऱ्या पक्षातील नेत्यांना पक्षात प्रवेश देत चांगली पदेही दिली आहेत. यावरूनही आता माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भारतीय जनता पक्षाला सल्ला देत ‘आयाराम गयारामांचे किती लाड पुरवणार?, अन्यथा आमच्या कार्यकर्त्यांमध्येही नाराजी पसरेल’, असा सूचक इशारा दिला आहे.“लोकसभा निवडणुकीत आम्हाला जाणवलं की, आयाराम गयाराम यांचे किती लाड पुरवावे? यालाही काही निर्बंध असणं गरजेचं आहे. शेतमजूर आणि बारा बलुतेदार यांचं नेतृत्व आम्ही करतो. मग त्यांचं प्रतिबिंब हे येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तरामध्ये उमटलं पाहिजे. निश्चतपणे योग्य तो सन्मान घटक पक्षांना देणं गरजेचं आहे. अन्यथा आमचे कार्यकर्ते फक्त लढण्यापुरतेच आहेत का? अशी भावना निर्माण होईल. तसेच आमच्याही कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य निर्माण होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे”, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.