महात्मा गांधीजींचे सान्निध्य आणि स्पर्श लाभलेले जे काही ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत, त्यापैकी एक म्हणजे प्रा. वासंती सोर. नवीन पिढीला महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधींच्या जीवनाबद्दल आज फारशी माहिती नसते, ही सर्व माहिती प्रा. सोर यांच्या या 'कस्तुरबा' पुस्तकातून होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी अन्वर राजन यांनी केले. महात्मा गांधीजींच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त ज्येष्ठ गांधीवादी प्रा. वासंती सोर लिखित कस्तुरबा या पुस्तकाचे प्रकाशन येथील होलाराम कॉलनीतील वैराज कलादालनात श्री राजन यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.महात्मा गांधीजी यांच्या बद्दल आतापर्यंत विस्तृत स्वरूपात लेखन झालेय. त्यातून वास्तवातील महात्मा गांधी समजावून घेणे सोपे आहे. महात्मा गांधींनी सांगितलेल्या सत्याची कास धरण्याच्या तत्त्वाचा अंगीकार करणे गरजेचे आहे, त्यासाठी त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या विपुल साहित्याचा उपयोग होईलच, पण त्यांची सहधर्म चारिणी असलेल्या कस्तुरबा गांधी यांच्याबद्दल प्रा. सोर यांच्या पुस्तकातून समजावून घेता येईल, असेही अन्वर राजन यांनी स्पष्ट केले. गांधीजी आणि कस्तुरबा यांचा प्रवास हा अदभुत असल्याचे सांगून दोघांच्या सहजीवनाबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी आपल्या मनोगतात प्रा. वासंती सोर म्हणाल्या की कस्तुरबा गांधींबद्दल विषयी फारच कमी लिहिले गेलंय, त्यामुळे आपण त्यांच्याबद्दल लिहावं, हा विचार आला. त्यात बा बापू यांच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त पुस्तक लिहिण्याचे पक्के केले. कस्तुरबांच्या भूमिकेत जाऊन हे पुस्तक लिहावे असे विचारांती ठरविलं आज कस्तुरबा पुस्तक प्रसिद्ध होण्याचा आनंद काहीतरी वेगळाच आहे, असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक प्रा. तुषार सोर यांनी केले.