उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना आणि आमच्या समोर चोरलेली शिवेसना असा सामना आहे.
मुंबई, दि. २६ : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. देशातील १२ राज्यं आणि एक केंद्रशासित प्रदेशासह ८९ मतदारसंघात मतदान होत आहे. राज्यातल्या ८ मतदारसंघात आज मतदान होत आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापाठोपाठ दुसऱ्या टप्प्यातही महाराष्ट्रातील नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.याचाच आधार घेत संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. बंद पडलेल्या ईव्हीएम मशीन संध्याकाळनंतर सुरु होतात. त्यानंतर ज्यांना हवे आहे त्या लोकांच्या झुंडी तिथे उभ्या राहतात. सकाळी येणाऱ्या मतदारांना निराश करणे हे या निवडणुकीच्या यंत्रणेतील मोदीकृत भाजपाचे षड्यंत्र असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे मतदारांचा खोळंबा होतोय. काही मतदार कंटाळून मतदानाकडे पाठ फिरवत असल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना आणि आमच्या समोर चोरलेली शिवेसना असा सामना आहे. या सर्व जागा आम्ही जिंकणार आहोत. आठ जागांवर भाजपाला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फार संघर्ष करावा लागत आहे. मी आपल्याला वारंवार सांगतोय, प्रत्येक टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणुका जिंकतील. किंबहुना तेच जिंकतील असं वातावरण आहे. आम्ही ३५ प्लस टार्गेट हा आकडा ठेवला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.