कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज उमेदवार असल्यामुळं शिवसेनेनं ती जागा काँग्रेसला सोडली आहे.
मुंबई, दि. ९ : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीने त्यांच्या सगळ्या जागा जाहीर केल्या आहेत. महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात ठाकरेंच्या शिवसेनेनं बाजी मारल्याचं स्पष्ट झालं आहे. मविआने २१-१७-१० जागांचा फॉर्म्युला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जाहीर केला आहे. ठाकरेंची शिवसेना लोकसभा निवडणुकीत २१ जागा लढणार आहे. काँग्रेस १७ जागांवर उमेदवार देणार असून शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस १० जागा लढणार आहे. सांगली आणि भिवंडी या दोन्ही जागांचा आग्रह काँग्रेसनं सोडला आहे.वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्येच जागांवरून संघर्ष सुरू होता. त्यातही सांगली आणि भिवंडीच्या जागेवरून मतभेद टोकाला गेले होते. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ ठरली आहे. मागील निवडणुकीत मुंबईतील एकही जागा जिंकू न शकलेल्या काँग्रेसला महाविकास आघाडीच्या जागावाटपात मुंबईतील दोन जागा मिळाल्या आहेत. उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या दोन जागा काँग्रेस लढणार आहे.मागील वेळेस जिंकलेल्या जवळपास सर्व जागा शिवसेनेनं यावेळी देखील राखल्या आहेत. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज उमेदवार असल्यामुळं शिवसेनेनं ती जागा काँग्रेसला सोडली आहे.